Ayodhya News : अयोध्या : अयोध्येमध्ये दि. २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामभक्तांना यासाठी ५०० वर्षे वाट पहावी लागली. व्हीएसआरएस वृत्तवाहिनीचे संपादक लालबाबू गुप्ता हे सध्या अयोध्यानगरीत असून त्यांनी आणि व्हीएसआरएस वृत्तवाहिनीच्या पथकाने अयोध्येतील दृष्ये टीपली असून त्याचे स्वतंत्र कव्हरेज व्हीएसआरएस वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनेलवर रामभक्तांना पाहता येणार आहे.
श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येत भक्तजनांचा सागर उसळला असून देशाच्या कानाकोपर्यातून भक्त अयोध्येकडे धाव घेत आहेत.
व्हीएसआरएस वृत्तवाहिनीच्या पथकाला हैद्राबाद येथून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आलेला एक किन्नरांचा गट आढळला. या किन्नर समुदायाबद्दल अशी आख्यायिका आहे की, प्रभू श्रीराम जेव्हा वनवासासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी अयोध्येतील नागरिकांचा जमाव त्यांच्यासोबत निघाला. मात्र, काही अंतर चालल्यानंतर श्रीरामांनी सर्व स्त्री पुरुषांनी आता परत अयोध्येत जावे असे सांगितले. त्यानुसार सर्व स्त्री पुरुष अयोध्येत परतले. त्या जमावात असणारे किन्नर मात्र तेथेच थांबले. जेव्हा १४ वर्षांनी प्रभू श्रीराम वनवासातून परतले तेव्हा त्यांची आतुरतेने वाट पाहत असलेले किन्नर त्याच जागी त्यांना दिसून आले. त्यावेळी श्रीरामांनी तुम्ही अजून इथेच का आहात असा प्रश्न त्यांना केला. त्यावर त्या किन्नरांनी उत्तर दिले की, प्रभू आपण स्त्री आणि पुरुषांना परत जाण्याचा आदेश दिला. मात्र, आम्हाला काहीच सांगितले नाही त्यामुळे आम्ही आपली वाट पहात येथे थांबलो आहोत. त्यांच्या या श्रद्धेने प्रसन्न झालेल्या श्रीरामाने यापुढे तुम्हाला समाजात कोठेही मंगलकार्य असएल तर बोलावले जाईल. तुमचा आदरसत्कार केला जाईल असा आशीर्वाद दिला. त्यानुसार आजही मंगलकार्याच्यावेळी किन्नरांना बोलावून त्यांचा आदरसत्कार करण्याची पद्धत भारतात अनेक ठिकाणी आहे.
या आख्यायिकेमुळे अनेक किन्नर आजही श्रीरामाची भक्तिभावे आराधना करतात. अशाच दृढ श्रद्धेमुळे अयोध्येत दर्शनासाठी आलेल्या किन्नरांशी व्हीएसआरएस वृत्तवाहिनीच्या पथकाने संवाद साधला.
रामभक्त हनुमानाच्या वेशात असलेल्या एका भक्ताने संपादक लालबाबू गुप्ता यांच्या समवेत श्रीरामाचा जयघोष करत मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
स्वतः संपादक लालबाबू गुप्ता श्रीराम भक्त असल्याने त्यांनी आणि त्यांच्या परिवारानेही मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्येतील भक्तीमय वातावरण पाहून ‘हर मन में राम; हर कण में राम’ ही स्थिती अनुभवल्याचे गुप्ता परिवाराने व्हीएसआरएस वृत्तवाहिनीच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले.
Discussion about this post