व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे सकाळी सव्वा सहा वाजता लाखो वारकरी भविकांसह माऊली माऊली च्या जयघोषात ,हरिनामाच्या गजरात व भक्तिमय वातावरणात पंढरपूर कडे प्रस्थान झाले.यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती.
यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार,श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार ,सोहळा मालक आरफळकर,बैल समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील,विश्वस्त विकास ढगे पाटील,विश्वस्त योगेश देसाई,बैलजोडीचे मानकरी तुळशीराम भोसले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे , मच्छिंद्र शेंडे, जालिंदर जाधव ,ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, सेवेकरी वर्ग, आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते.
उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांनी पादुकांचे पूजन केले. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला.
महापालिकेतर्फे आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. महापालिकेच्या शाळा व खाजगी ठिकाणी दिंड्यांची व्यवस्था केली होती. आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक केली होती. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका व अग्निशमन बंब आणि जवान आहेत.
Discussion about this post