व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारी घेण्यात आली होती. त्यानुसार सर्वांनुमते प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले होते.
मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा ते मान्य केले होते. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. सर्व काही नियोजनाप्रमाणेच सुरू होते. मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, अशी विनंती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले की, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेऊन गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून नियोजन करण्यात आले होते.
Discussion about this post