Pune News : पुणे : पुण्यातील नागरिकांना केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे.हा साठा मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे. पिंपरी चिंचवड शहराची स्थितीही फारशी वेगळी नाही. येथे मागील काही वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातही तो पुरेशा दाबाने आणि वेळेनुसार होत नसल्याच्या तक्रारी शहराच्या विविध भागातून अनेकदा येत असतात.पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी पाणी जपून वापरा असे आवाहन करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर जर सध्या सुमारे ४० अंश सेल्सियसच्या आसपास असणारे तापमान वाढू लागले तर पाण्याचे जास्त बाष्पीभवन होईल. आणि, त्यामुळे शिल्लक पाणीसाठाही दोन महिने पुरेल की नाही असा प्रश्न आहे.
गेल्या वर्षी याच तारखेला पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९५.१९ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी उपलब्ध पाणीसाठा ४७.९९ टक्के होता. यंदा जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये बुधवारअखेर ५६.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या केवळ २८.३९ टक्के आहे. हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८.८८५ टीएमसी कमी आहे.
जिल्ह्यातील उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी धरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी आहे.
Discussion about this post