व्हीएसआरएस मराठी न्युज –संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायत प्रशासन जय्यत तयारी केली आहे.
आरोग्य, स्वच्छता आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दहा टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत.
संत तुकाराम महाराज देऊळवाड्याला विद्युत् रोषणाईही करण्यात आली आहे. या सोहळ्याचे यंदाचे ३७५ वे वर्ष आहे. राज्यातून तसेच परराज्यातूनही भाविक ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्या’साठी येतात, अशी माहिती संस्थानच्या वतीने विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली.
विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले की, यंदा इंद्रायणी नदीत पाणीसाठा भरपूर आहे; परंतु त्यात सांडपाणी सोडले जात आहे. देहू नगरपंचायत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गावातील सांडपाणी नदीत सोडू नका, अशी मागणी आम्ही केली आहे. वैकुंठगमन स्थानाजवळ प्रतिदिन सांडपाणी सोडले जात आहे. त्याच ठिकाणी भाविक स्नान करून तीर्थ म्हणून तेच पाणी पितात, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे दायित्व प्रशासनाचे असेल.
गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत महिंद्रा सर्कल ते आयटी चौक रोड हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.
Discussion about this post