व्हीएसआरएस मराठी न्युज –देहू:आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान शेतकरी ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हिरा-राजा आणि सागर टिळेकर यांच्या हिरा-मोती या बैलजोडीस मिळाला आहे,
अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.यावेळी पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरवर्षी संस्थानकडे इच्छुक शेतकरी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा म्हणून अर्ज करतात. यावेळेस संस्थानकडे विविध भागातून १७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार प्रत्यक्ष गोठ्यावर जावून संस्थान विश्वस्त मंडळाने बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. तसेच त्या कुटुंबाची वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ व पालखी सोहळ्या दरम्यान त्यांच्या असलेला सहभाग हे ही लक्षात घेण्यात आले. यावरून त्यांनी १७ पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडल्या. संस्थानने देऊळवाड्यात यावेळी अंतिम दोन बैलजोडीची सर्वानुमते निवड केली.
यात शेडगे आणि टिळेकर यांच्या बैलजोडीस मान मिळाला. त्याचप्रमाणे पायी वारीतील चौघडा गाडीसाठी शेतकरी जालिंदर बोत्रे यांच्या बैलजोडीस मान मिळाला आहे.
Discussion about this post