व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणेकरांवर घोंघावणारं पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. पुणे आणि ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीकपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 मेपर्यंत पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. 15 मेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन करुन उपलब्ध असलेल्या धरणातील पाणी साठ्यातून महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा आणि पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वेधशाळेने आणि इतर हवामान अभ्यासकांनी सांगितल्याने प्रशासन सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंतचं पाणी साठ्याचं नियोजन करण्याची तयारी केली आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला – 1.07 टीएमसी, पानशेत – 3.41 टीएमसी, वरसगाव – 6.75 टीएमसी, टेमघर – 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीत पाणीसाठा नियोजनासंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर पाणी कपात सध्याच होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
शहर आणि जिल्ह्यातील उन्हाळी आवर्तन,जिल्हा आणि शहराचा पाणीपुरवठा याविषयी आजच कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीची वेळ सकाळी 11 वाजताची वेळ होती. मात्र रात्री अचानक या कालवा समितीच्या बैठकीची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे अजित पवार दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले होते.
Discussion about this post