व्हीएसआरएस मराठी न्युज -यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे व उच्च शिक्षण बी.ए., एलएल. बी. कोल्हापूर व पुणे येथे झाले. १९३० मध्ये महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला. १९३२ मध्ये त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले.
सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. १९४६ मध्ये तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदारसंघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. १९४८ मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे १९६२-६६ या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, १९६६-७० गृहमंत्री, १९७०-७४ पर्यंत अर्थमंत्री आणि १९७४ पासून परराष्ट्रमंत्री बनले.
चिनी आक्रमणानंतर संरक्षणखात्यात चैतन्य आणण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडली. अर्थमंत्री असताना माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे इ. उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीत झाल्या. चलनवाढीला आळा घालण्याचे कडक उपाय योजण्याच्या धोरणाचा प्रारंभही यशवंतरावांच्या कारकीर्दीत झाला. ते पोथीनिष्ठ नव्हते. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावा, अशी त्यांची इच्छा व प्रयत्न असत. झगमगाटापेक्षा संथपणा, सातत्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ठ्य होते. अशा या प्रतिभाशाली नेत्याचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी निधन झाले.
Discussion about this post