मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असं वादग्रस्त वक्तव्य कंगनानं केलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशाभरातून तिच्यावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आलं आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘कंगनाबेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजेत ही देशाची मागणी आहे. अन्यथा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हक्क आता भाजपाला राहिलेला नाही. कंगनाला तरी काही लाज लज्जा तीने माफी तरी मागावी. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना कंगनानं जे वक्तव्य केलं हे भाजपला मान्य आहे का. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर व फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे,’ अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे.
ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी हे तुमच्या घरचे नोकर असल्यासारखं काम करत आहोत. या आमच्याकडे, आम्ही तयार आहोत. पण हे शस्त्र २०२४ नंतर तुमच्यावर उलटेल. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. एक दिवस तलवारीची मूठ आमच्याकडे येईल तेव्हा तोंड लपवायला जागा राहणार नाही. तुम्ही कितीही कारस्थान केली तरी तपास यंत्रणानी यांचं मोहरे होऊ नये, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post