व्हीएसआरएस मराठी न्युज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आळंदीमधून प्रस्थान होत आहे. दरम्यान मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा केला जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज झाला नाही, केवळ बाचाबाची झाली असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षीची स्थिती पाहता यावेळी बैठकीत मनाचा दिंड्यासाठी 75 पासेस देत आत सोडण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून चेंगरा चेंगरी होणार नाही. त्याप्रमाणे आज मनाच्या दिंड्याचे लोक पोहचले होते. परंतु इतर लोकांनी आत घुसण्याचा आग्रह केला आणि बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना थांबवण्यात आले, परंतु लाठीचार्ज झाला नाही असे त्यांनी सांगितले.
श्री फडणवीस म्हणाले, मुळात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून निर्णय घेतला होता. चुकीची घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले. काही माध्यमानी संयमाने घटना दाखवली, त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्यामुळे लाठीचार्ज झाला नसताना जनतेच्या भावना भडकवू नका, वारकरी यांच्या सुरक्षेचा विषय आहे असे आवाहन फडणवीस यांनी राजकीय पक्षांना केले आहे. मागील वर्षी आमचं सरकार नव्हतं. पण आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. कोणी राजकारण करत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव येते असेही फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या लाठीचार्जची घटना क्लेषदायक आहे.
महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
आळंदीतील घटनेवर पिंपरी-चिंचवडवरील घटनेवर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले.
Discussion about this post