व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्रातील श्रद्धेचे व तीर्थक्षेत्र समजले जाणारे देहू आणि आळंदी परिसर, या दोन परिसरांना जोडणारी इंद्रायणी नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे. काल इंद्रायणी नदीत केमिकलच्या वापरामुळे पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पडली होती, त्यानंतर प्रशासनाची दमछाक झाली.
पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई करत सहा कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत होता. अखेर सहा कंपन्यांच्या मालकांविरोधात पालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पालिकेच्या मलनि:सारण विभागाने तक्रार दाखल केली आहे.
तळवडे ते डुडुळगाव आणि आळंदी हद्दीपासून चर्होलीपर्यंत इंद्रायणी नदीची सीमा आहे. चिखली ते मोशीपर्यंत नदी परिसरात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या पर्यावरण विभागाचे कोणतेही नियम पाळत नाहीत. भोसरी एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडत होत्या. त्यामुळे नदी प्रदूषित होत होती. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा अनेक सामाजिक संस्था सातत्याने मांडत होते. त्यानंतर पालिकेने पाहणी केली असता अनेक कंपन्या व लघु उद्योजकांनी कंपन्यांचे घाण पाणी नदीत सोडल्याचे दिसून आले. या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती. यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
इंद्रायणी नदीवर बर्फाची चादर दिसत होती. अत्यंत थंड प्रदेशाप्रमाणे इंद्रायणी नदी बर्फाच्या चादरसारखी होती. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी आळंदी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महेश महाराज मडके यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज सकाळी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इंद्रायणी नदीत केमिकल सोडणाऱ्या कंपन्यांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post