व्हीएसआरएस न्युज – हिंगोणे
चाळीसगाव – हिंगोणे या चाळीसगाव तालुक्याच्या सीमेवरील छोट्याश्या गावात लहानाचा मोठा झालो, सुखाचे दुखाचे अनेक प्रसंग आले. माझ्यासह गावातील उमदेवार यांचा तीन वेळा पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव झाल्याने गावात कधीच लोकप्रतिनिधीत्व आले नाही. जेव्हा माझ्या आमदारकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली तेव्हा पूर्ण गावाने याच शाकंभरी मातेच्या मैदानावर गट – तट विसरून माझ्यामागे उभे राहण्याची शपथ घेतली. निवडणूक काळात माता भगिनींनीसह पूर्ण गावाने सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण तालुक्यात नातेगोते, मित्र परिवार पिंजून काढला, आपला भैय्या आमदार होईल या भावनेने सर्वांनी निरपेक्ष भावनेने काम केले. माझे तालुका सोबत होताच मात्र त्यागोदर गाव सोबत राहणे गरजेचे होते. हिंगोणे गावाने एकी दाखवली व मला आशिर्वाद दिल्याने आज राज्याच्या सर्वोच्च सभागृहात बसण्याचे भाग्य मला मिळाले. गावाने निस्वार्थपणे दिलेल्या या प्रेमाची परतफेड व गावाच्या ऋणातून मुक्त कदापि होता येणार नाही पण मात्र मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवत गावाच्या सर्वांगीण विकासाचा अनुशेष भरून काढेल. गावातील कुठल्याही घरातील वैद्यकीय, शैक्षणिक आदी छोट्या मोठ्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी माझ्या मनाचे व घराचे दरवाजे अर्ध्यारात्री खुले राहतील असा शब्द आपणाला देतो. आजचा सत्कार हा मायभूमीचा सत्कार असल्याने त्याचे मूल्य करता येणार नाही असे सांगत ‘हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र तारे” अश्या कवितेच्या पंक्ती सादर करत आपल्या भावना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
ते आपल्या मुळगाव हिंगोणे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून हिंगोणे येथील चौक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपट तात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, संजय गांधी समितीचे अध्यक्ष के बी दादा साळुंखे, माजी बाजार समिती सभापती रविंद्र आबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, माजी जि.प.सदस्य शेषराव बापू पाटील, पं.स.सदस्य सुभाष पाटील, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, हिंगोणेसीम चे सरपंच ज्ञानेश्वर माउली, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे, राम पाटील, चेतन पाटील, सुरेश महाराज, कैलास पाटील, सयाजी नाना, बाळासाहेब पाटील, दिलीप काका पाटील, एल टी नाना, वाल्मिक अण्णा, आदी मंचावर उपस्थित होते.
हिंगोणे गावात आमदार मंगेश चव्हाण यांचे आगमन होताच त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते माता शाकंभरी देवीची पूजा करण्यात आली. त्यांनतर गावाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला महिलावर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
मनोगतात पुढे आमदार चव्हाण यांनी अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला. गावातील आरोग्य उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका होणार असून ती हिंगोणे गावाची ओळख बनेल. आगामी काळात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गल्ली कॉक्रीटीकरण, पथदिवे आदी मुलभूत सुविधा टप्प्या टप्प्याने उभारल्या जातील. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मात्र ज्याप्रमाणे निवडणुकीत एकी दाखवत मला आशिर्वाद दिला त्याप्रमाणेच गावाचा विकास व शांतता व मन एकत्र राहण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटतात्या भोळे, के बी दादा साळुंखे, संजय तात्या पाटील, प्रा.सुनील निकम सर, रोहन सूर्यवंशी, एल.टी.नाना, भावेश कोठावदे, यांनी मनोगतातून आमदार मंगेश चव्हाण व हिंगोणे गावाविषयीचे आपले ऋणानुबंध मनोगतांच्या माध्यमातून उलगडून दाखवले.