व्हीएसआरएस न्युज पंढरपूर : नुकतीच कार्तिकी एकादशी पार पडली. यंदा कोरोनाच्या सावटामुळे आषाढीसह कार्तिकी वारी देखील वारकऱ्यांना करता आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करून ही कार्तिकी एकादशी अत्यंत साधेपणाने पार पडली.
आषाढी वारी यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली परंतु कार्तिकी वारी करू देण्यात यावी यासाठी काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर, २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ पासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर, मुखदर्शन देखील बंद करून सामान्यांसाठी मंदिर पुन्हा बंद करण्यात आले होते.
वारकरी संप्रदायाने सामंजस्याचे दर्शन घडवत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले.
आता, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवसांनंतर आजपासून पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. दरम्यान, भाविकांना ऑनलाईन नोंदणी करूनच विठुरायाचं दर्शन घेण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.