व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी: उर्से व कामशेत या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील भाजपची सत्ता जाऊन तेथे महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. दरम्यान, भाजपचा मावळ हा बालेकिल्ला महाविकास आघाडीने उध्वस्त करीत ४९ पैकी ४० ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केला आहे.
तर मावळचा गड शाबूत राखत उलट मागील वेळेपेक्षा जास्त म्हणजे ५७ पैकी ३९ ग्रामपंचायतीत भाजप आणि आरपीआय युतीचा विजय झाल्याचा प्रतिदावा माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे आणि भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी केला आहे.
मावळातील ५७ पैकी आठ ग्रामपंचायती विनिविरोध झाल्याने ४९ ठिकाणी मतदान झाले. शेळके यांनी विधानसभेला मावळ हा भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला. त्यानंतर झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीच विजयी झाल्याचा दावा त्यांनी निकालानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तो त्या-त्या ग्रामस्थांचा विजय आहे. त्या ग्रामपंचायतींवर आम्ही दावा केलेला नाही. त्याप्रमाणे भाजप किंवा अन्य कोणीही दावा करू नये, असे आमदार शेळके म्हणाले. ८० टक्के ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून तेथे पूर्वी भाजपची सत्ता होती, अशी माहिती त्यांनी दिली.