Mumbai News : ,मुंबई : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांनी सोमवारी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशिष शेलार, प्रदेश भाजपाचे कोषाध्यक्ष व ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ.मिहीर कोटेचा, आ.राम कदम, खा.मनोज कोटक, अमरजीत मिश्रा, प्रभाकर शिंदे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी अश्विनी मते व त्यांच्या समर्थकांचे भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत केले. यावेळी प्रदेश भाजपाचे कोषाध्यक्ष व ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ.मिहीर कोटेचा म्हणाले की, अश्विनीताई या सामान्य माणसाची कामे मार्गी लावण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत. नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी अश्विनी मते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अश्विनी मते यांच्या भाजपा प्रवेशामुळे मिहीर कोटेचा यांचे मताधिक्य आणखी वाढणार आहे, असे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खा.मनोज कोटक यांनी सांगितले.
उबाठा गटात काम करताना आपल्याला विकास कामे करताना त्रास होत होता म्हणून आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे अश्विनी मते यांनी सांगितले. अश्विनी मते यांच्यासमवेत उबाठा गटाच्या विनायक कोरडे, बाळू सोमटोपे, मलंग शेख, सुरेश मोरे, अर्जुन चौरसिया, महावीर नाईक, महेंद्र सोनावणे या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
Discussion about this post