Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे तीन दिवसांपूर्वी स्पार्कल्स बनविणा-या कारखान्यात स्फोट झाला. या अपघातात सुरुवातीस ६ आणि त्यानंतर उपचारा दरम्यान ३ अशा एकूण ९ महिलांचा बळी गेला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायीसमिती सदस्या सीमा सावळे यांनी आणखी किती बळी घेणार आहात असा सवाल करत पालिका प्रशासनाला या प्रकरणी धारेवर धरले आहे.
सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. निवेदनात त्या म्हणतात; सुरवातीला या घटनेत सात मृत्यू होते आता तो आकडा नऊ झाला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत पण त्यांच्या तब्बेतीत सुधारणा नाही. दिवसेंदिवस या दुर्घटनेचे गांभीर्य वाढत चालले आहे मात्र, बधीर प्रशासनाला गम नाही.
महापालिकेच्या भ्रष्ट, निगरगट्ट, असंवेदनशील प्रशासनाच्या कामकाजाचेच हे निष्पाप बळी आहेत. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंह, अग्नी प्रतिंबधक विभाग प्रमुख, अवैध बांधकाम नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून संबंधित प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सीमा सावळे यांनी केली आहे.
यापूर्वी पूर्णानगर येथे हार्डवेअर दुकानाला आग लागून दुकानाच्या पोटमाळ्यावर राहणा-या पाचजणांचा बळी गेला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट केले. त्यामध्ये हजारो इमारतींना आग प्रतिबंधक यंत्रणा नाही किंवा त्याचे प्रमाणपत्र नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. असे असूनही या प्रकरणी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.
तळवडे येथील दुर्घटनेत गेलेले बळी हे महापालिकेच्या भ्रष्ट, निगरगट्ट, असंवेदनशील कारभाराचेच बळी आहेत असा आरोपही सावळे यांनी केला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी कुठेतरी कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज आहे, असे सीमा सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Discussion about this post