औरंगाबाद ।
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत, १ मे रोजी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घोषणापूर्वीच (शनिवारी) हे मैदान मनसेकडून बुक करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर इतर कोणीही हे मैदान बुक करू, नयेत म्हणून मनसेकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी ज्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील राज ठाकरेंच्या तोफेचे गोळे कुणाच्या दिशेने असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आत्तापासूनच सुरू झाली आहे.
पुण्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मोठ्या गोष्टींची घोषणा केली. ज्यात ०१ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा तर ०५ जूनला आयोध्या येथे भेट देणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. परंतु, औरंगाबादच्या ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी सभा घेण्याचा जाहीर केलं ते मैदान इतर कुणीही बुक करू नयेत, म्हणून मनसेकडून कालच हे मैदान २९ एप्रिल ते ०२ मे या चार दिवसांसाठी बुक करण्यात आले होते.
Discussion about this post