Pimpri News : पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मागील ९ वर्षांपासून चालविलेला हा रुग्णसेवेचा उपक्रम त्यांच्या पश्चात शंकरशेठ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांनी सुरू राखल्याबद्दल हे दोघेही कौतुकास पात्र आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दि. ५ डिसेंबर रोजी सांगवी येथे काढले.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर दि. ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ सुमारे ५ लाख रुग्ण घेणार आहेत.या शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनीताई जगताप, पालिका आयुक्त शेखर सिंह, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, उमेश चांदगुडे आदी उपस्थित होते.
रुग्णसंख्या वाढीचे ‘रूटकॉज’ शोधण्याची गरज
आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत पुढे म्हणाले, आज या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सुमारे दीड लाख रुग्ण उपस्थित राहणार आहेत. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. एव्हढ्या मोठ्यासंख्येने रुग्णसंख्या का वाढत आहेत त्याचे रूटकॉज शोधण्याची गरज आहे. ते दूर करण्याची गरज आहे.
उजनीचे प्रदूषित पाणी ही मोठी समस्या
वाढते हवा, पाणी प्रदूषण आणि शेतीमध्ये रासायनिक किटकनाशकांचा सुरू असलेला वापर यामुळे कॅन्सर, मधुमेह यासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आपण अधिक उत्पादनासाठी, पैशांसाठी शेतीमध्ये रासायनिक खते वापरणे बंद करून नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. आज पाणीप्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. आपल्याकडे पाहिले तर उजनीसारखे मोठे धरण; ज्यातून पुणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि कर्नाट्काचा काही भाग यांना पाणीपुरवठा होतो. त्याचे पाणी पूर्णपणे प्रदूषित बनले आहे. अनेक कारखाने, शहरे यांचे सांडपाणी त्यामिसळत आहे. परिणामी या प्रदेशातील ९५ टक्के जनता भविष्यात कॅन्सरग्रस्त होण्याची शक्यता असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हे लक्षात घेतले तर केवळ याला आळा घालण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर, नागरिकांचीही आहे. जनतेने आपले नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित करण्याचे थांबविले पाहिजे.
आपला दवाखाना योजनेला पालिकांचा नीट प्रतिसाद नाही : आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यशासन राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ‘माता सुरक्षित; घर सुरक्षित’, जागृत पालक; सुदृढ बालक’, आणि आता ‘ आरोग्य तरुणाईचे; वैभव महाराष्ट्राचे’ अशी अभियाने राज्याच्या आरोग्य यंत्रणेने राबविली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रसरकारकडून ‘आपला दवाखाना’ योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळाला. त्यातून राज्यात मोठ्याप्रमाणात क्लिनिक्स सुरू करण्यात आली. मात्र, महापालिका क्षेत्रात याला पालिका प्रशासनाकडून नीट प्रतिसाद मिळालेला नाही केवळ १४ टक्के निधी खर्च झाला आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेची आरोग्य सेवा मुंबई खालोखाल म्हणजेच राज्यात दुसर्या क्रमांकाची असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र, त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच शहरातील जलस्त्रोत प्रदूषणाच्या प्रश्नावर गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी आयुक्तांना यावेळी केली.
शहरातील पाणीप्रदूषण कर्करोगाचे कारण : खासदार श्रीरंग बारणे
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पश्चात आमदार अश्विनीताई जगताप आणि शंकरशेठ जगताप यांनी आरोग्यशिबिराचा उपक्रम चालू ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन ज्या आजाराने झाले त्या कर्करोग या आजाराचे रूटकॉज शहरातील पाणीप्रदूषण असल्याची बाब आपल्या भाषणात अधोरेखित केली. शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या रावेत बंधार्यातील पाणी मोठ्याप्रमाणावर प्रदूषित होत असल्याचे सांगून त्यावर पालिकेने योग्य उपाययोजना करावी अशी सूचनाही त्यांनी केली. पूर्वी पंजाबमध्ये कॅन्सररुग्णांची संख्या सर्वाधिक होती आता महाराष्ट्रात सर्वात अधिक कॅन्सररोगी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
पीपीपी तत्त्वावर चालविणार कॅन्सर रुग्णालय : आयुक्त शेखर सिंह
पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेची माहिती उपस्थितांना दिली. पालिकेची सर्व रुग्णालये उत्तमप्रकारे रुग्णसेवा करत आहेत असा दावा त्यांनी केला. तसेच थेरगाव येथील रुग्णालय पीपीपी तत्त्वावर कॅन्सर रुग्णालयात परिवर्तीत करण्याचा पालिका प्रशासनाचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post