व्हीएसआरएस मराठी न्युज –नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवानंतर सरकारवर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. सरकारकडून आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूच असून त्याला आवर घालण्यासाठी राज्य शासनाने काडीही उचललेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ’दोषींवर कठोर कारवाई’ करण्याचे पोकळ आश्वासन देण्यापलीकडे काहीही ठोस उपाययोजना सुचवलेली नसल्याचे नारकर यांनी म्हटले. सरकार खरोखरच या बाबतीत गंभीर असेल, तर सर्वप्रथम राज्यातील आरोग्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणीदेखील त्यांनी केली.
राज्य शासनाने आपल्या गैरकारभाराने सार्वजनिक रुग्णालयांचे रूपांतर जणू स्मशानभूमीत केले असल्याचे माकपने म्हटले आहे. राज्यभरातील संपूर्ण सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अपुरे मनुष्यबळ, खंडित औषध पुरवठा, बंद पडलेली तपासणी यंत्रे, साधनसुविधांची कमतरता, रुग्णालयांतील महत्त्वाच्या सेवांचे खासगीकरण, पैसा कमवायला बसलेले ठेकेदार आदी व्याधींनी त्रस्त असल्याने ती अक्षरशः ज्वालामुखीच्या तोंडावर उभी असल्याचे वास्तव या क्षेत्रातील अधिकारी व्यक्त करत असल्याकडे माकपने लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र शासनाने आपल्या धोरणाने शासकीय आरोग्यव्यवस्था मृत्युपंथाला लावली असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबाबत सरकार गंभीर असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे.
Discussion about this post