व्हीएसआरएस मराठी न्युज -रामायणातील ‘सुंदरकांड’ आणि तुलसीदासांच्या ‘हनुमान चालिसा’मध्ये बजरंगबलींचे चरित्र तपशीलवार आणि ठळकपणे मांडले आहे. त्यानुसार हनुमानाचे चरित्र तरुणांसाठी प्रत्येक रूपात प्रेरणादायी आहे.
हनुमान हे विद्वान, सद्गुणी आणि अतिशय हुशार आहेत. ते नुसते विद्वान नाहीत, तर सद्गुणीही आहेत. ते उच्च आदर्शांशी केवळ परिचित नाहीत, तर ते आदर्श आत्मसात करणारे आहेत. ते आपल्या शब्दाने, वागण्याने आणि विचारांनी भगवान श्रीरामांच्या आदर्शावर चालतात. समुद्र पार करत असताना जेव्हा मैनाक पर्वताने हनुमानाला विश्रांती घेण्यास सांगितले., तेव्हा हनुमंतांनी त्याची विनंती ना स्वीकारली, ना नाकारली. मैनाक पर्वताचा आदर राखून हात जोडून नमस्कार केला आणि ते पुढे निघाले. वास्तविक, मैनाक हा सोन्याचा पर्वत असून, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हनुमानाने या वर्तनातून असे सांगितले की, आनंद आणि सुखसोयींच्या सान्निध्यात आले, तरी आपले लक्ष्य विसरता कामा नये. भक्त उद्यमशील असतो. तो विलासी नसतो.
हनुमंतांकडून संवादकौशल्य, नम्रता, आदर्शवाद हे गुण घेण्यासारखे आहेत. रावणाच्या अशोकवनात हनुमान सीतेला पहिल्यांदा भेटले. वानराकडून श्रीरामांची खबर ऐकून सीता घाबरली; परंतु हनुमानाने संवाद कौशल्याने आपण रामरायांचे दूत आहोत, हे पटवून दिले. महासागर पार करत असताना देवांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी सुरसाला पाठविले. हनुमंताचा मार्ग अडविण्यासाठी सुरसाने शरीराचा विस्तार केला. प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही आपला आकार दुप्पट केला. त्यानंतर त्यांनी एक सूक्ष्मरूप धारण केले आणि त्यामुळे सुरसाला आनंद झाला. म्हणजेच केवळ ताकदीने विजय मिळत नाही. नम्रतेने कार्य सहज पूर्ण करता येते. लंकेतील रावणाच्या बागेत हनुमान आणि मेघनाद यांच्यातील युद्धात मेघनादाने ब्रह्मास्त्र वापरले. हनुमानही असे अस्त्र काढू शकले असते; परंतु त्यांनी तसे केले नाही. कारण, त्यांना त्या अस्त्राचे महत्त्व कमी करायचे नव्हते. तत्त्वांशी तडजोड करू नये, ही शिकवण यातून त्यांनी दिली.
मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे म्हणून मी शेंदूर लावते. मारुती तर रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभू श्रीरामांना समजल्यावर ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, मारुतीराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे. पुढील एका श्लोकात हनुमानाच्या अंगी असलेल्या गुणाचे वर्णन केलेले आहे.
Discussion about this post