News Delhi : नवी दिल्ली : सन २००२ मध्ये गुजराथमधील गोध्रा येथे झालेल्या दंगलीत बिल्किसबानो या महिलेवर बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ७ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या ११ जणांना माफी देऊन त्यांची सुटका करण्याचा गुजराथ सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे या ११ दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. हा गुजराथ सरकारला मोठा धक्का आहे.
सर्व दोषींनी दोन आठवड्यात तुरुंग प्रशासनासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने असून या दोषींच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका कायम ठेवण्यायोग्य असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.
न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि उज्वल भुयान यांच्या पीठाने गुजरात सरकारने माफीचा आदेश पारित करणे अयोग्य आहे असेही मत नोंदविले आहे.
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या शिक्षा माफीच्या याचिकेवर निर्णय देताना गुजरात सरकारने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाराचा वापर केला. शिक्षा माफीवर निर्णय घेणे हे महाराष्ट्र सरकारचे अधिकार क्षेत्र आहे. ज्या राज्यामध्ये गुन्हेगारावर खटला चालवला जातो आणि शिक्षा सुनावली जाते, ते राज्य दोषींच्या माफीच्या याचिकेवर निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post