Pune News : पुणे : देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचा वेगवान विकास गरजेचा असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ते शनिवारी (१३ एप्रिल २०२४ ) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने पुणे स्टेशन येथील हॉटेल शेरटन ग्रँड येथे आयोजित ‘पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक परिसरातील मनुष्यबळ व्यवस्थापकांसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी औद्योगिक कंपन्यामधील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात येतील असेही सांगितले. निवडणूक आचारसंहिता असल्याने कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यासाठी मार्गदर्शक नियमांचे बंधन असल्याने आपण कोणतीही जाहीर घोषणा करू शकत नसल्याचे स्पष्टीकरण देत,नंतर मात्र एनआयपीएमच्या शिष्टमंडळाला बोलावून या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत आपण निश्चितच बैठक घेऊ असेही अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहर हे देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे शहर असून विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग आणि आय. टी. हब म्हणून पुणे शहर ओळखले जाते.पुणे शहरात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, चांगली शाळा, महाविद्यालये आणि एकूणच सर्व पायाभूत सुख सुविधा यामुळे पुणे शहर हे कायमच उद्योगजगताच्या गुंतवणुकीसाठी आकर्षण बिंदू ठरले आहे. देशात कोणताही नवीन उद्योगधंदा यायचा असल्यास प्रथम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पुणे शहर यालाच प्राधान्य असते त्यामुळेच या शहराची औद्योगिक भरभराट झाली आहे.मात्र गेल्या काही काळापासून पुणे शहर आणि पुण्याजवळील औद्योगिक परिसरातील झुंडशाही आणि गुंडशाही अतिशय टोकाला गेल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेक मनुष्यबळ व्यवस्थापक हे त्याचे बळी ठरत आहेत. कोणतीही नवीन फॅक्टरी सुरु होणार असेल तर त्यासाठी खडी, वाळू, बांधकाम साहित्य तसेच लेबर कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट, पाणी टँकर, वाहतूक कंत्राट, हे आपल्याकडूनच घ्यावे आणि तेही आम्ही सांगू त्याच दरात घ्यावे असे म्हणून प्रचंड प्रमाणात दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. यावर नक्की योग्य
ती कारवाई करण्यासाठी आपण योग्य त्या सूचना संबंधित विभागांना देऊ, त्याबाबत पाठपुरावा घेऊ असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी एनआयपीएम व मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्यावतीने मनुष्यबळ व्यवस्थापकांना
भेडसावणाऱ्या समस्यांचे लेखी निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरचे अध्यक्ष नवनाथ सूर्यवंशी यांनी केले. तर एनआयपीएमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी तसेच मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश करंजकर यांनी आपल्या मनोगतातून मनुष्यबळ व्यवस्थापकांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांबाबत सविस्तर भाष्य केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला व्यासपीठावर एनआयपीएमच्या राष्ट्रीय खजिनदार अमृता तेंडुलकर, एनआयपीएमच्या पश्चिम विभागाचे प्रादेशिक उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर चे सचिव अभय खुरसाळे, एनआयपीएमच्या पश्चिम विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य अमोल कागवाडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर उपस्थित होते.
प्रश्नोत्तर सत्रात मनुष्यबळ व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही अजित पवार यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर चे सचिव अभय खुरसाळे यांनी केले.
या कार्यक्रमाला पुणे,पिंपरी- चिंचवड,चाकण,भोसरी, मुळशी, हिंजवडी, हडपसर, बारामती, जेजुरी आदी औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांचे सुमारे चारशेहुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते.सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
Discussion about this post