Pimpri News : पिंपरी : आवाक्याबाहेर असणारे महागडे उपचार आणि तपासण्या सर्वसामान्य माणसाला परवडावे या हेतूने हे ‘अटल महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची दूरदृष्टी यातून दिसून येते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. ५ जानेवारी रोजी नवी सांगवी येथे काढले.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर दि. ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराच्या भेटीच्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, सामान्यांसाठी संघर्ष, नव्या योजनांची सुरुवात आणि सामान्य माण्सांच्या छोट्या छोट्या गरजा ओळखणारे लक्ष्मणभाऊ हे खरे लोकनेते होते. ते आज आपल्यात नाहीत याचे दु:ख आहे.परंतु अश्विनीताई आणि शंकरशेठ त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर लोकसेवेचा वसा घेऊन चालत आहेत ही बाब महत्त्वाची आहे. या शिबिरासाठी दीडलाख रुग्णांनी नोंदणी केली असून आज ६६ हजार रुग्ण येथे येऊन गेले ही विशेष बाब आहे.
सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळावेत म्हणून महायुती सत्तेत आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून ५ लाखांपर्यंत करण्यात आली. आता या योजनेला अधिक रुणालये जोडण्याचे काम सुरू आहे.
नामोल्लेख न करता आव्हाडांवर टीका
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाबद्दल बोलताना फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, गेली ५०० वर्षे जो कलंक लागला होता, तो १९९२ साली पुसला गेला. आता श्री राम जन्मस्थळी प्राणप्रतिष्ठा होत आहे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.
शोषित, पीडित, दलित, वंचितांच्या हितासाठी असणारे राज्य म्हणजेच रामराज्य. शिवरायांच्या रयतेच्या राज्याची संकल्पनाही रामराज्यावरच आधारलेली होती. असे असताना काही वाचाळवीर या वेळी निरर्थक वाद निर्माण करत आहेत.प्रसिद्धीची एव्हढी हाव असू नये. प्रभू श्रीराम त्यांना सुबुद्धी देवो.
Discussion about this post