Pimpri News :पिंपरी : “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की आम्ही, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ हजारो नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत घेतली आणि १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते या पर्वामध्ये नागरिकांनी शपथ घेतली,यामध्ये विविध भागातून कार्यक्रमासाठी आलेले आदीवासी बांधवही उपस्थित होते.
या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,नोडल अधिकारी मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच पिंपरी येथील पुतळ्यास अतिरिक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदान करणे आपले महत्त्वाचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी १०० टक्के मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
Discussion about this post