व्हीएसआरएस मराठी न्युज –
चीनमध्ये 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या सुरु असून या स्पर्धेत क्रिकेटही यंदा खेळवले जात आहे.
दरम्यान पुरुषांची क्रिकेट स्पर्धा 27 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पण भारताच्या उच्च मानांकनामुळे त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच एशियाडमध्ये सहभागी झाला आहे.
दरम्यान, या स्पर्धेसाठी आता भारताचा पुरुष क्रिकेट संघही चीनला रवाना झाला आहे. चीनला जातानाचे फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर गुरुवारी शेअर केले आहेत. भारतीय संघ या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा असे अनेक युवा खेळाडू आहेत. तसेच वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडूही संघात आहेत.
या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहाणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांनाही थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
भारताचा पहिला सामना 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याला सकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. तसेच 6 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीतील सामना जिंकला, तर 7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळेल.
दरम्यान, या स्पर्धेतील सामन्यांसाठी सकाळी 6.30 वाजता आणि 11.30 वाजता असा वेळ ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेतील सर्व सामने टी20 क्रिकेट प्रकारात होणार आहेत. तसेच सर्व सामने झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे होणार आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेत अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांची स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर पुरुषांची क्रिकेट स्पर्धा सुरू झाली.
- आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक) , आकाश दीप
राखीव खेळाडू – यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन
Discussion about this post