व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबईला या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून मोलाची भूमिका पार पाडली. पण आगामी हंगामासाठी रोहितच्या ऐवजी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने आतापर्यंत प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा तिसरा किंवा चौथा कर्णधार नाहीये. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सहावा कर्णधार होता. तर हार्दिक पंड्या या फ्रँचायझीचा 9वा कर्णधार आहे. 2008 साली आयपीएल सुरू झाली तेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा चेहरा, मुंबई इंडियन्सची ओळख होती. त्याला मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. पण प्रत्यक्षात मुंबईचा पहिला कर्णधार बनण्याचा मान मिळाला हरभजन सिंग याला.
दुखापतीमुळे सचिन तेंडुलकर आयपीएलच्या पहिल्या हंगामात बहुतांश वेळा विश्रांतीवर होता. याच कारणास्तव हरभजन सिंग पहिल्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करू शकला. एकंदरीत विचार केला, तर हरभजनने मुंबईसाठी 30 सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली. यातील 14 सामन्यात विजय, तर 14 सामन्यात संघाला पराभव मिळाला. राहिलेले दोन सामने हे अनिकाली होते. 2008 ते 2012 यादरम्यान हरभजनला नेतृत्वाच्या या संधी मिळाल्या.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू शॉन पोलॉक यानेही मुंबईसाठी कर्णधाराची भूमिका पार पाडली. आयपीएल 2008 मध्येच त्यालाही संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या हंगामात त्याने चार सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि त्यातील तीन सामने मुंबईने जिंकले देखील. सचिन तेंडुलकरने आयपीएल 2008 ते 2011 दरम्यान मुंबईसाठी 55 सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले. यातील 32 सामन्यात मुंबई संघ विजयी, तर 23 सामन्यात पराभूत झाला.
आयपीएल 2010 मध्ये ड्वेन ब्राओ यानेही एका सामन्यात मुंबईचे नेतृत्व केले होते. या सामन्यात संघाला पराभव मिळाला होता. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग मुंबईचा पाचवा कर्णधार ठरला. पाँटिंगकडून फ्रँचायझीला फार अपेक्षा होत्या. पण 2013 साली अवघ्या सहाच सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले आणि दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. यातील तीन सामन्यांमध्ये पाँटिंगने संघाला विजय मिळवून दिला, तर तीन सामन्यात पारभव स्वीकारला.
रिकी पाँटिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) 2013 हंगामात पहिल्यांदा मुंबईचा कर्णधार झाला. रोहितने मागच्या दहा हंगामांमध्ये मुंबईसाठी 163 सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यापैकी 91 सामने संघाने जिंकले आहेत. 68 सामन्यांमध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पराभव स्वीकारला. दरम्यानच्या काळात म्हणजे 2014 ते 2021 दरम्यान कायनर पोलार्ड यालाही 9 सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यापैकी पाच सामन्यांत संघ विजयी, तर चार सामन्यात पराभूत झाला. सूर्यकुमार यादव मुंबईसंघाचा आटवा कर्णधार आहे. मागच्या वर्षी सूर्यकुमारच्या नेतृत्वात मुंबईने एक सामना खेळला आणि जिंकला होता. आता पुढच्या वर्षी मुंबईचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा हार्दिक पंड्या या फ्रँचायझीचा नववा कर्णधार असेल.
Discussion about this post