व्हीएसआरएस न्युज पिंपरी- कोरोना साथरोगाच्या काळात पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारे एक पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, आरोग्य सेवक, पोलीस, कर्मचारी वर्ग यांना आधीपासूनच फ्रंट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र यासोबतच पत्रकार वर्गही वार्तांकन करण्यासाठी बाहेर पडत असतो. कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात, सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्यात चौथा स्तंभ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक पत्रकारांना वार्तांकन करताना कोरोनाची लागण झाली आहे, तर काही जणांना जीवही गमवावा लागला आहे.
अशावेळी त्यांचे लसीकरण वेगानं करून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काही राज्यांनी यासंदर्भात पाउलं उचलली असून आता महाराष्ट्रातही ही मागणी केली जात आहे. या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याच्या गृहविभागाचेही असे मत असल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारे एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील कोविड-19 या साथरोगाच्या अनुषंगाने अनेक ज्येष्ठ पत्रकारांकडून पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत निवेदन प्राप्त होत आहेत.
देशातील इतर काही राज्यात पत्रकारांना त्या त्या राज्याने फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित केले असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा विविध स्तरातून अनेक पत्रकारांकडून फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा असे माझ्या विभागाचेही मत आहे.
तरी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील कोविड-19 या साथरोगाच्या अनुषंगाने पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, ही विनंती.