व्हीएसआरएस न्युज पिंपरी : विधान परिषद निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकून मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगाव मावळ ((जि. पुणे) येथे सांगितले.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले पक्षाचे युवा नेते पार्थ पवार या निवडणुकीनिमित्त पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसले.
पार्थ हे मावळ आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही आढावा बैठकांना प्रदेशाध्यक्षांबरोबर उपस्थित होते. ते पुन्हा सक्रिय झाल्याने उपस्थितात तो चर्चेचा विषय होता. राज्यात सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्य पातळीवरची ही पहिली निवडणूक दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढत असल्याने ती जिंकलीच पाहिजे, असे पाटील यांनी पिंपरी चिंचवडच्या पदाधिकारी बैठकीत बजावले.
आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजितदादानंतर दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष शहरात आल्याने पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसले.
पिंपरी चिंचवड अगोदर पाटील यांनी मावळातील पक्षाची आढावा बैठक एका हॉटेलमध्येच घेतली. मावळचे पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे पदवीधरमधील अरुण लाड आणि पुणे शिक्षकचे जयंत आसगांवकर हे आपले दोन्ही उमेदवार तुलनेने उजवे असल्याने आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र काम केल्यास विजय आपलाच आहे, असे सांगत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न या वेळी केला.