मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जबाब नोंदवण्यात आला. आता मुंबई पोलिस सागर बंगल्यातून बाहेर पडले असून फडणवीसांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. मात्र, यामध्ये नेमके काय प्रश्न विचारण्यात आले? याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.
फडणवीस यांनी चौकशीत मांडलेली माहिती पुरावे नेमके कुठून आले? याची माहिती मुंबई पोलिसांनी फडणवीसांना विचारली. तसेच फडणवीसांनी जे आरोप केले ते कशाच्या आधारावर केले? असा प्रश्नही मुंबई पोलिसांनी विचारला. फडणवीसांनी पोलिसांच्या बदल्यांबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता तसेच एक अहवाल देखील मांडला होता. ते पुरावे कुठून आलेत? याबाबत देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. पण, देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं नाही. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.
एसआयटीमधून काही माहिती लीक झाली होती. त्यामुळे पाच अज्ञान लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही जणांची चौकशी सुरू आहे. फडणवीसांना देखील याबाबत नोटीस पाठवली आहे. त्यांनी एक पेनड्राईव्ह सादर केला, ती माहिती नेमकी कुठून मिळाली? याबाबत त्यांचा फक्त जबाब नोंदवला जात आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
वांद्रे सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलिस अधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांचा जबाब नोंदवला. १२ वाजतापासून सुरू झालेली चौकशी २ वाजता संपली. जवळपास दोन तास ही प्रक्रिया चालली. यापूर्वीच भाजपच्या अनेक नेत्यांनी सागर बंगल्याकडे धाव घेतली. यावेळी प्रविण दरेकर यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणतात…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी पोलीस प्रक्रियेवर बोलू शकत नाही. पण कायदा आपलं काम करेल. भाजपला नैराश्य आले आहे. याच नैराश्यातून भाजप महाविकासआघाडी सरकारवर आरोप करत आहे. आम्ही केंद्र सरकारप्रमाणे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी काढता पाय घेतला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Discussion about this post