व्हीएसआरएस न्युज ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला.
या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
मंगळवारी(१९ जानेवारी) या सामन्याचा शेवटचा दिवस होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ९७ षटकात ७ विकेट्स गमावत ३२९ धावा केल्या आणि हा सामना खिशात घातला.
या डावात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.