Pune News : पुणे : पुण्यातील फिनिक्स मॉल जवळून ३० मार्च रोजी अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचा खून झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. पैशांच्या लालसेने तिच्याच मित्राने आपल्या साथीदारांकरवी तिचे अपहरण करून तिचा खून केला असल्याचे उघड झाले आहे.
मूळच्या लातूर जिल्ह्यातील हरंगुळ येथील असलेल्या आणि पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२, रा. स्टँझा लिव्हिंग, प्रिसो हाऊस, सकोरेनगर, विमाननगर) हिचे अपहरण झाल्याची तक्रार तिचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९, रा. हरंगुळ, लातूर) यांनी विमाननगर पोलीसठाण्यात दिली होती.
वाघोली येथील जी. एस. रायसोनी महाविद्यालयात ‘बीई कॉम्प्युटर्स’चे शिक्षण घेणारी भाग्यश्री ३० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलमध्ये गेली होती. तेथून बाहेर पडल्यानंतर ती शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे यांच्याबरोबर गेली होती. मात्र, त्यानंतर तिचा तिच्या घरच्यांशी संपर्क झाला नाही. तिच्या आईच्या मोबाईलवर ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.’ असा मेसेज आला. यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची व्यवस्थित चौकशी केल्यानंतर त्यांनी भाग्रश्रीचा खून करून तिचा मृतदेह सुपे गावाजवळ एका शेतात जाळून पुरून टाकल्याची कबुली दिली.
आरोपींपैकी शिवम फुलवाळे हा भाग्यश्री शिकत असलेल्या रायसोनी महाविद्यालयात आयटीच्या तिसर्या वर्षात शिकत आहे. अन्य दोघे सागर जाधव आणि सुरेश इंदूरे हे त्याचे मित्र असून ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे भाग्यश्रीचे अपहरण करून तिच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्याचा कट त्यांनी रचला होता.
Discussion about this post