व्हीएसआरएस न्युज मुंबई वाहन चालकांनसाठी आता नवीन दंड नियमावली (Trafic Rules) लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीत दंडाच्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंड वसुलीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासंदर्भातील निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार अनेक वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढंच नाहीतर, तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवणाऱ्यांना आधीचा दंड 500 रुपये होता. पण आता या दंडात वाढ होऊन आता तो 5 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
वाहतुकीच्या नव्या नियमांबाबतच्या अधिसूचनेनुसार, वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्तपणे वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम 500 रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारनं त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती देत असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु, राज्यात वाहतूक नियमांचं होणारं उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2021 ला अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच ही अधिसूचना काल (सोमवारी) म्हणजेच, 13 डिसेंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या मोटर वाहन कायद्यात वाहतूक नियम भंग केल्यास रुपये 200 ते 1 लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे. उदाहरणार्थ वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट जर विहीत नमुन्यात नसेल त्यात दादा, मामा, नाना, बाबा फॅन्सी बदल केले असतील तर पहिल्यांदा 500 रुपये, तर दुसऱयावेळी 1500 रुपये दंड आकारण्यात येईल.
असा असेल नवा दंड
- वाहनांची शर्यत लावल्यास प्रथम गुन्ह्यास 5000 रु. दंड तर दुसऱया गुन्ह्यास 10,000 रु. दंड.
- विनाकारण हॉर्न वाजविल्यास पहिल्यांदा 500 रुपये दंड आणि दुसऱयावेळी 1500 रुपये दंड असेल.
- विना हेल्मेट – पहिल्यांदा 500 रु. आणि दुसऱया अपराधास 1500 रु. दंड असेल.
- वेगाने वाहन चालविल्यास दुचाकी वा तीन चाकी वाहनास 1000 रु., ट्रक्टर वाहनास 1500 रु. आणि हलक्या वाहनास 4000 रु. दंड असेल.
- वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास प्रथम गुन्ह्यास दुचाकीला 1000रु., तीन चाकीला 2000रु., जड वाहनास 4000 रु. दंड आणि दुसऱया अपराधास 10,000 रु. दंड असणार आहे.
Discussion about this post